नवी मुंबई : एन पी न्यूज 24 – राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते एका पाठोपाठ भाजपा, शिवसेनेत जात असताना आता ही गळती अगदी नगरसेवकांपर्यंत येऊन पोहचली आहे. नवी मुंबईतील ५५ नगरसेवक हे वेगळा गट स्थापन करणार आहेत. त्यासंबंधीचे पत्र ते आज कोकण विभागीय आयुक्तांना देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही एकमेव महापालिका आहे. तीही त्यांच्या हातातून निसटणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते गणेश नाईक हे येत्या ९ सप्टेंबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याअगोदर ५७ पैकी ५५ नगरसेवक महापालिकेत आपला वेगळा गट तयार करणार आहे. गेल्या महिन्यात या सर्व नगरसेवकांनी बैठक घेऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे यापूर्वी केवळ राजकीय पातळीवर असलेला हा निर्णय आता प्रत्यक्ष सभागृहात दिसून येण्यासाठी आवश्यक ती पुर्तता या निर्णयाद्वारे घेतली जात आहे. त्यामुळे सर्वात कमी संख्या बळ असतानाही महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार आहे. राज्यातील दोन तृतीयांश महापालिकेवर आता भाजपाचा झेंडा लागला आहे.