नवी दिल्ली :एन पी न्यूज 24 – कर्जधारकांसाठी मोठी खुशखबर असून लवकरच कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने येत्या 1 ऑक्टोबरपासून सर्व कर्ज रेपो रेटशी जोडायला सांगितल्याने सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहेत. त्याचा सर्वात मोठा फायदा हा गृह कर्ज असणाऱ्या नागरिकांना होणार आहे. त्यामुळे आता सर्व बँकांना देखील चाप बसणार असून तुमची होणारी लूटमार देखील थांबणार आहे.
याआधीच रिझर्व्ह बँकेने सर्व कर्ज रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले होते. मात्र आता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी हि 1 ऑक्टोबरपासून होणार आहे. त्याचबरोबर तीन महिन्यातून एकदा व्याजदरामध्ये बदल देखील करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली होती. यामुळे बँका देखील व्याजदरांमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा देतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या कमी झालेल्या दराचा कोणताही फायदा दिला नाही. मागील काही दिवसांत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 1.10 टक्के कपात केली आहे. तर बँकांनी मात्र अतिशय नगण्य कपात केली होती.
दरम्यान, या निर्णयाचा मोठा फायदा ग्राहकांना सर्व प्रकारच्या कर्जांवर होणार आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ज्यावेळी रेपोरेट मध्ये कपात करेल त्यावेळी त्याचा फायदा थेट ग्राहकांना देण्याचे काम हे बँकांचे असणार आहे.