राष्ट्रीय उद्योग धोरणामध्ये कामगारांचे हित जोपासले जावे : महापौर राहुल जाधव 

0

एनपी न्यूज 24 पिंपरी :  राष्ट्रीय पातळीवर उद्योग, व्यवसायात वाढ व्हावी यासाठी देशात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली पाहिजे. त्या उद्देशाने केंद्र सरकार अनेक क्षेत्रात एफडीआयला अनुकूल धोरण आखत आहे. या राष्ट्रीय उद्योग धोरणामध्ये कामगारांचे हित जोपासले जावे अशी मागणी आपण कामगार नगरीचा प्रथम नागरिक या नात्याने केंद्र व राज्य सरकारकडे करू असे प्रतिपादन, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी केले.

सोमवारी हिंद कामगार संघटनेच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त खराळवाडी, पिंपरी येथे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ज्येष्ठ कामगार नेते माधव रोहम यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व पिंपरी चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, इंटकचे जिल्हा सरचिटणीस मनोहर गाडेकर, खडकी ॲम्यूनिशन फॅक्टरी प्रतिनिधी शशिकांत धुमाळ, संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, खजिनदार सचिन कदम, कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्रसिंह वालिया, अब्दूल अजिज, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंद फडतरे, अनिल रोहम, उमेश धर्मगुत्ते आदींसह अनेक कंपनीतील कामगार प्रतिनिधी, बंधू-भगिनी उपस्थित होते.

या वेळी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते माधव रोहम यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली येथील पुरग्रस्तांसाठी हिंद कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते पंचवीस हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस महापौर राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर ज्या कामगार संघटना काम करतात. त्यात इंटक ही सर्वात मोठी संघटना आहे. त्या संघटनेचे जिल्हा पातळीवर नेतृत्व आणि राज्य व देशपातळीवर अनेक पदांवर काम करण्याची संधी कैलास कदम यांच्यासारख्या कामगारनगरीतील एका कामगाराच्या सुपुत्रास मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे हित जोपासले जाईल असा विश्वास आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून डॉ. कैलास कदम यांनी कामगारांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले आहेत. वेळ प्रसंगी त्यासाठी त्यांनी आंदोलन, उपोषण, कलेक्टर कचेरीवर व कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढले आहेत. तसेच काम करणा-या माधव रोहम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पाठबळ देण्याचे काम हिंद कामगार संघटना करीत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही महापौर जाधव म्हणाले.

स्वागत, प्रास्ताविक करताना डॉ. कैलास कदम म्हणाले की, देशभर औद्योगिक मंदिचे सावट आहे. पिंपरी चिंचवड उद्योगनगरी ही ॲटोमोबाईल क्षेत्रांशी संबंधित कामगारनगरी आहे. या क्षेत्रात जास्त मंदी आहे. लघुउद्योगांवर आणि कायम व कंत्राटी कामगारांच्या कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. कामगारांचा आर्थिक स्तर सुधारण्याऐवजी त्यांच्यावर बेरोजगारीची कु-हाड पडत आहे.

कामगार जगण्यासाठी येथील कारखाने, उद्योग, व्यवसाय जगले पाहिजेत. हे हिंद कामगार संघटनेचे धोरण आहे. परंतू यामध्ये कामगारांचे न्याय हक्क देखील अबाधित राहिजे पाहिजेत. औद्योगिक जागतिकिकरणाच्या बदलांमध्ये कामगारांच्या हक्कांचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी संघटना नेहमी प्रयत्नशील असते. त्यासाठी अनेक न्यायालयीन लढे देखील संघटनेने यशस्वीपणे लढले आहेत. या शहराची सर्वांगीण वाढ ही कामगारांच्या कष्टाने झाली आहे. येथील कामगार सन्मानाने जगला तरच शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास होऊ शकतो. या प्रवाहात कामगारांच्या हिताचे रक्षण करणे ही राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी आहे. भांडवलदारांना रेड कार्पेट टाकत असताना कामगारांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी कामगारनगरीचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनीदेखील केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशीही मागणी डॉ. कैलास कदम यांनी या वेळी केली. सुत्रसंचालन यशवंत सुपेकर, आभार सुरेश सरडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.